महाराष्ट्र आता थांबणार नाही, भाजपा युती सरकार राज्याला कर्जबाजारी करून देशोधडीला लावणार: हर्षवर्धन सपकाळ*
लाडकी बहिण'चा भाजपा युती सरकारकडून विश्वासघात, २१०० रुपये देण्याचा उल्लेख नाही

*महाराष्ट्र आता थांबणार नाही, भाजपा युती सरकार राज्याला कर्जबाजारी करून देशोधडीला लावणार: हर्षवर्धन सपकाळ*
*शेतक-यांना कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव वर अर्थसंकल्पात घोषणा नाही. शेतक-यांना मोफत विजेची पोकळ घोषणा.*
*’लाडकी बहिण’चा भाजपा युती सरकारकडून विश्वासघात, २१०० रुपये देण्याचा उल्लेख नाही.*
*महाभ्रष्टयुती सरकारकडून महाराष्ट्र कर्जबाजारी, आठ लाख कोटींचे कर्ज,राज्याचे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त.*
मुंबई, दि. १० मार्च २०२५;
आजचा अर्थसंकल्प हा नेहमीप्रमाणे आकड्यांचा खेळ असून मागील पानावरून पुढे असा अर्थसंकल्प आहे. कोणत्याही घटकाला यातुन काहीही फायदा होणार नाही. राज्यावर आठ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असून उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे. निवडणूक दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता सरकारने राज्यातील जनतेचा विश्वासघात केला आहे. राज्यात आर्थिक बेशिस्तीचा कारभार सुरु असून महाराष्ट्र आता थांबणार नाही, तर भाजपा युती सरकार राज्याला कर्जबाजारी करून देशोधडीला लावणार असेच दिसते आहे असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
राज्याच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की राज्याचा अर्थसंकल्प हा महानगरांसाठी बनवलेला आहे त्यात मेट्रो उड्डाणपूल भुयारी मार्ग, विमानतळं, कनेक्टिव्हिटी पायाभूत सुविधा यांचाच बोलबाला आहे. पण राज्यातल्या जनतेला भेडसावणा-या मूलभूत समस्या सोडवण्याबाबत सरकारकडे काही ठोस धोरण किंवा उपाययोजना नाही. अर्थसंकल्पात प्रत्येक विभागाला निधीची केलेली तरतूद ही मंत्र्यांना मलई खाण्यासाठी दाखवलेला लोण्याचा गोळा आहे. आजच्या अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफी बद्दल एक शब्द ही नाही. शेतक-यांना मोफत वीज देण्याची घोषणा सुद्धा पोकळ असून आजही शेतक-यांना वसुलीसाठी वीज बिले पाठवली जात आहेत. शेतकरी सन्मान निधीत वाढ करण्याचे आश्वासन दिले पण अंमलबजावणी नाही. शेतक-यांच्या मेहनतीमुळे कृषीक्षेत्रामुळे विकास दर वाढला पण सरकारने शेतक-यांच्या मालाला भाव दिला नाही त्यामुळे शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
शेतक-यांचा विरोध असतानाही शक्ती पीठ महामार्गाचा अट्टाहास करून भाजपा युती सरकार शेतक-यांना उद्ध्वस्त करू पहात आहे. समृद्धी महामार्गाने कोणाची समृद्धी हे सर्वांना माहित पण तशीच समृद्धी पून्हा व्हावी यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. सरकारने जाहीर केलेले प्रकल्प, गुंतवणूक ही फक्त मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक या भागापुरताच असून राज्याचा मोठा भाग विकासापासून वंचितच आहे.
लाडकी बहिण योजनेतून २१०० रुपये देण्याची घोषणा केली नाही. हा शेतकरी व लाडक्या बहिणींचा विश्वासघात आहे. जवळपास १० लाख भगिनींना योजनेतून वगळण्यात आले आहे. उद्योग धंद्याची वाढ ५.६ टक्क्यांवरून ४.९ टक्क्यांवर घसरली आहे. सेवा क्षेत्र ही घसरले आहे त्यामुळे रोजगार कमी झाले आहेत. परकीय गुंतवणूक वित्तीय क्षेत्रात आली आहे, औद्योगीक क्षेत्रात नाही ही अत्यंत काळजी वाढवणारी बाब आहे.
आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार फक्त मुंबई पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर , कोल्हापूर या जिल्ह्यांची परिस्थिती चांगली आहे पण बाकी जिल्ह्यांची अवस्था दयनीय आहे. या जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न देशाच्या सरासरी उत्पन्नापेक्षा कमी आहे. ५० लाख रोजगार निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ऐकायला चांगले पण हे आकडे फक्त कागदावरच राहणार आहेत. महाराष्ट्रात बेरोजगारांच्ये फौजा आहेत. त्यांच्या हाताला नोकरी रोजगार नाही राज्यातील बेकारीचे चित्र अत्यंत भयावह आहे. राज्य सरकारची अडाच लाख रिक्त पदे आहेत ती भरण्यासाठी काहीच धोरण नाही.
अर्थसंकल्पाची सुरुवात करताना वित्त मंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांना अभिवादन केले. शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारकाची अद्याप वीट रचली नाही आणि हे सरकार आग्र्यात स्मारक उभे करण्यास निघाले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची घोषणा केली पण याच महापुरुषांचा अपमान करणा-या कोरटकर, सोलापूरकर व त्यांच्या पिल्लावळीवर कारवाई करत नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.



