वंचित युवा’च्या आंदोलनाचा धसका नमलेल्या जि.प. प्रशासनाने अन्यायकारक निलंबन केले रद्द : दोन्ही कर्मचाऱ्यांना मिळाला न्याय

वंचित युवा’च्या आंदोलनाचा धसका
नमलेल्या जि.प. प्रशासनाने अन्यायकारक निलंबन केले रद्द : दोन्ही कर्मचाऱ्यांना मिळाला न्याय
बुलढाणा, दि. १६ (प्रतिनिधी)
कर्तव्यात कुठलाही कसूर केला नसताना सहायक शिक्षक व ग्राम विकास अधिकाऱ्यास निलंबित करून बीडीओंनी अन्याय केला. द्वेषभावनेतून केलेली अन्यायकारक कारवाई मागे घेऊन दोन्ही कर्मचाऱ्यांना तातडीने सेवेत रुजू करवून घ्यावे, या मागणीसाठी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या मांडला. निलंबन रद्द करेपर्यंत जागचे हलणार नाही, असा पवित्रा घेतल्याने जि.प. प्रशासन हादरले. निलंबन मागे घेण्याचे दिलेले आश्वासन नमलेल्या प्रशासनाने पाळत अवघ्या दहा दिवसांच्या आतच शिक्षक व ग्रामविकास अधिकाऱ्यांचे निलंबन सीईओ भाग्यश्री विसपुते यांनी रद्द केले. तसे आदेश १३ व १५ डिसेंबरला काढून कर्मचाऱ्यांना रुजू करवून घेण्याचे फर्मान यंत्रणेला सोडले.
वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार हे कर्मचाऱ्यांवर झालेल्या अन्यायाविरोधात पेटून उठले. कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी ६ डिसेंबर रोजी शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन आंदोलन सुरू केले. थेट जि.प.च्या सीईओ भाग्यश्री विसपुते यांच्या कक्षात ठिय्या मांडण्यात आला. मात्र, सीईओ उपस्थित नसल्याने सतीश पवार यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला वेठीस धरून निलंबित कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची मागणी रेटून धरली. तसेच सीईओंच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून प्रशासनाच्या मनमानी कारभाराबद्दल रोष व्यक्त केला.
तालुक्यातील इजलापूर जिल्हा परिषद शाळेचे सहायक शिक्षक रविकांत जाधव तसेच पिंपळगाव सराईच्या ग्रामविकास अधिकारी ज्योती मगर यांच्यावर निलंबनाची केलेली कारवाई चुकीची आणि पूर्वग्रह दूषित असल्याचे सतीश पवार यांनी ठामपणे सांगितले आणि कायदेशीर मार्गाचा अवलंब करत निलंबन बेकायदेशीर असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. या आंदोलनाचा धसका घेत प्रशासनात एकच खळबळ उडाली. प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) समाधान वाघ व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) खरात यांनी दोन दिवसांत निलंबन मागे घेण्याचे आश्वासन दिले. तसेच झालेल्या चुकीबद्दल दिलगिरीही व्यक्त केली. त्याचवेळी सतीश पवार यांनी निलंबनाची कारवाई मागे घेण्याकरिता दोन दिवसांऐवजी दहा दिवसांचा अवधी दिला. दिलेल्या आश्वासनाला जागत सीईओ भाग्यश्री विसपुते यांनी अवघ्या दहा दिवसांतच आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांनी निलंबनाची नियमबाह्य केलेली कारवाई मागे घेत निलंबनाचे आदेश रद्द केले. जि.प. प्रशासन अखेर झुकले आणि दोन्ही कर्मचाऱ्यांना न्याय मिळाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी सतीश पवार यांच्या रुपाने आम्हाला देवच भेटल्याची भावना व्यक्त केली. तसेच खरा न्याय झाल्याच्या प्रतिक्रिया जि.प. कर्मचाऱ्यांमध्ये उमटल्या आहेत.
बीडीओंच्या बेकायदेशीर कार्यपद्धतीवर ठेवले बोट
ग्रामविकास अधिकारी ज्योती मगर यांच्या निलंबनावर मत नोंदवताना सीईओ भाग्यश्री विसपुते यांनी बुलढाणा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी विहीत कार्यालयीन पद्धतीचा अवलंब न करता किरकोळ स्वरुपाच्या दोषारोपावरून निलंबन केल्याचे म्हटले आहे. अखेर महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (शिस्त व अपिल) नियम १९६४ मधील नियम ३ (५) मधील तरतुदीनुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सीईओंनी ज्योती मगर यांच्या निलंबनाचा आदेश रद्द केला. त्याचप्रमाणे बीडीओंच्या कारवाईवर बोट ठेवत सीईओंनी सहायक शिक्षक रविकांत जाधव यांचेही निलंबन मागे घेतले. जाधव यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आदेशाला आव्हान दिले आहे. उच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या तसेच खाते चौकशीच्या अधिन राहून रविकांत जाधव यांना चौथा जि.प. शाळेत पदस्थापनेचे आदेश दिले.
शोषित, पीडित, वंचित, अडल्यानडलेल्यांसह सरकारी कर्मचारी आणि सामान्यांसाठी वंचित बहुजन युवा आघाडी नेहमीच धाऊन जात आहे. प्रशासनातील काही दुष्टप्रवृत्तींकडून जाणूनबुजून कर्मचाऱ्यांना त्रास दिल्याची बाब आम्ही कदापिही सहन करणार नाही. पीडित शासकीय कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्यांनी कुठलीही तक्रार असल्यास ती आमच्या कानावर घालावी, वंचित बहुजन युवा आघाडी तातडीने न्याय देण्यासाठी हजर होईल.
सतीश पवार
जिल्हाध्यक्ष