खोटे गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांचा आवाज दाबता येणार नाही – रविकांत तुपकर

 शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी गेल्या ३ महिन्यांपासून आम्ही रस्त्यावरची लढाई लढत आहोत. या लढाईत आम्हाला शेतकरी, तरूण व सर्वसामान्यांचा भरभक्कम पाठिंबा मिळत असल्याने अनेकांच्या पाया खालची वाळू सरकली आहे. त्यामुळे आमच्यावर खोटे गुन्हे केले जात आहेत. काही सत्ताधारी नेत्यांच्या आदेशावरून खोटे गुन्हे दाखल करून अटक करण्याचा घाट घातला जात आहे. परंतु असे कितीही खोटे गुन्हे दाखल केले, तरी शेतकऱ्यांचा हा आवाज दाबता येणार नाही, असे प्रतिपादन शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर व सोनाळा येथील ‘एल्गार परिवर्तन मेळाव्यां’त केले.
 
        रविकांत तुपकरांच्या संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर व सोनाळा येथील २१ जानेवारीच्या ‘एल्गार परिवर्तन मेळाव्यां’ना गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अतिशय उत्साहात फटाक्यांची अतिषबाजी करत गावकऱ्यांनी तुपकरांचे स्वागत केले. तर काकनवाडा बु. येथे ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढून गावकऱ्यांनी स्वागत केले. बावनबीर व सोनाळा येथील परिवर्तन एल्गार मेळाव्याला शेतकरी, शेतमजूर गावगाड्यातील सामान्य नागरिक महिला तसेच तरुणांची मोठी संख्या होती. यावेळी बोलतांना रविकांत तुपकर यांनी सांगितले की, शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा मानले जाते, पण जगाच्या पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांची घोर थट्टा राज्यात केली जात आहे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहे. खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न देखील काही सत्तेतील नेत्यांनी लावला आहे. परंतु शेतकऱ्यांचा हा लढा आपण सुरूच ठेवणार असून किती गुन्हे दाखल केले, आणि कितीही दबाव आणला तरी शेतकऱ्यांचा हा लढा सोडणार नाही. काही नेत्यांचा अन्याय आणि ही हुकूमशाही उलथवून टाकण्यासाठी आता गावगाड्यातील शेतकरी, शेतमजूर, नागरिक, महिला आणि युवकांनी एकत्रित येऊन परिवर्तनाची लढाई लढणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी या परिवर्तनाच्या लढ्याला तन-मन- धनाने ताकद द्या. काळ्या मातीत राबणाऱ्या हातांचा आशीर्वाद घेऊन हा सर्व सामान्यांचा लढा आपल्याला जिंकायचा आहे, त्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन यावेळी रविकांत तुपकर यांनी केले.
 
       यावेळी श्याम अवथळे, अमोल राऊत, वासुदेवराव उन्हाळे, अनंता मानकर, अक्षय पाटील-भालतडक, दिपक पाटील-अढाव, नानासाहेब पाटील, सचिन शिंगोटे, अस्लम शेख, सुनील अस्वार, नयन इंगळे, प्रशांत खोडे, श्रीकृष्ण मसुरकार, योगेश मुरुख,आशिष सावळे, दत्तात्रय जेऊघाले, वैभव जाणे, शिरू पाटील, अश्फाक देशमुख, विठ्ठल महाले, प्रतीक गावंडे, सौरभ बावस्कर, शेख तौसिफ, आकाश वानखेडे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांकडून तुपकरांना लोकवर्गणी प्रदान :
         दरम्यान बावनबीर येथे झालेल्या मेळाव्यात मधुकरकाका आढाव यांनी रविकांत तुपकर यांना लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी लागणार्‍या खर्चात लोकसहभाग म्हणून र५१ हजारांचा धनादेश दिला तर  सचिनजी कोरडे यांनीही २१ हजारांचा निधी दिला. त्यांनी टाकलेला हा पाठीवरील हात, शेतकरी-कष्टकऱ्यांसाठी ताकदीने काम करण्याची ऊर्जा देणारा आहे, अशी भावना रविकांत तुपकरांनी यावेळी व्यक्त केली.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *