आंदोलनातील गुन्ह्यात रविकांत तुपकरांना दिलेला जामीन रद्द करून त्यांना तुरुंगात ठेवावे अशी मागणी, पोलिसांनी जिल्हा न्यायालयाकडे केलेली आहे. याप्रकरणी ७ फेब्रुवारी २०२४ रोजी पहिली सुनावणी घेण्यात आली आणि आज ८ फेब्रुवारी रोजी उर्वरित सुनावणी संपन्न झाली. न्यायालयात दोन्ही पक्षांनी जोरदार युक्तिवाद केला. रविकांत तुपकर यांच्या बाजूने त्यांच्या पत्नी ॲड. शर्वरी सावजी-तुपकर यांनी बाजू मांडली.
तब्बल दोन तास हा युक्तिवाद चालला. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. या प्रकरणी अंतिम निकाल आता १५ फेब्रुवारी रोजी येणार आहे. रविकांत तुपकरांच्या जामीनाबाबत नेमका काय निर्णय लागतो याकडे संपूर्ण जिल्हा वासियांचे लक्ष असून आता अंतिम निकालासाठी १५ फेब्रुवारी पर्यंत वाट पहावी लागणार आहे.
याप्रकरणी ८ फेब्रुवारी सकाळी ११:३० वाजता पुन्हा सुनावणीला सुरवात झाली. रविकांत तुपकर स्वतः न्यायालयात हजर झाले होते. न्यायालयात तब्बल दोन तास जोरदार युक्तिवाद झाला रविकांत तुपकर यांच्या बाजूने त्यांच्या पत्नी ॲड.शर्वरी सावजी तुपकर यांनी बाजू मांडली. रविकांत तुपकर यांच्यावर दाखल असलेले गुन्हे हे आंदोलन, सत्याग्रहाचे आहेत. त्यांच्यावर एकही चुकीचा गुन्हा दाखल नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणे, आंदोलन करणे हा गुन्हा ठरत नाही. या देशाला आंदोलनातूनच स्वातंत्र्य मिळाले आहे, असा युक्तिवाद ॲड.शर्वरी सावजी तुपकर यांनी केला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला असून आता या प्रकरणी १५ फेब्रुवारी रोजी अंतिम निर्णय येणार आहे.