बातमी
वाईट कर्म त्यागा , सुखाने जगा- भंते राज्यज्योती
बाबासाहेबांचे परिवर्तनाचे स्वप्न साकारण्यासाठी काम करणार - आ.सिद्धार्थ खरात

वाईट कर्म त्यागा , सुखाने जगा- भंते राज्यज्योती
बाबासाहेबांचे परिवर्तनाचे स्वप्न साकारण्यासाठी काम करणार – आ.सिद्धार्थ खरात
देऊळगाव साखरशा ‘बुद्ध मूर्ती ‘ प्रतिष्ठापना कार्यक्रम उत्साहात
मेहकर/बुलढाणा – क्रोधाचे कर्म माणसाला सुखाने सुखाने जगू देत नाही . समाजात न्याय, स्वतंत्र, समता, बंधुता ही नितीमूल्ये वाढली पाहिजे, त्यासाठी वाईट कर्म त्यागा म्हणजे सुखाने जगता येईल असा उपदेश भंते राज्यज्योती यांनी दिला . तर बाबासाहेबांनी लोकशाहीत तथागतांचे तत्व अंगीकारले. बाबासाहेबांच्या पुण्याईनेच समाजात बदल झाल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी , ९५ टक्के लोकांकडे देशाची संपत्ती असून पाच टक्के समाज आजही गरिबीत गुदमरतो आहे त्यामुळे हा न्याय झाला नाही.बाबासाहेबांनी दिलेली लोकशाही देशाने स्वीकारली तर विषमता ,बेरोजगारी आजही डोके वर का काढते आहे असा सवाल उपस्थित करत ,बाबासाहेबांच्या व्यवस्था परिवर्तनाचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करणार अशी ग्वाही आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिली . मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथे थायलंड देशातून आणलेल्या बुद्ध मूर्तीचा प्रतिष्ठापना कार्यक्रम आज १२ मे रोजी सारनाथ बुद्ध विहारात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून आमदार सिद्धार्थ खरात बोलत होते. पुढे बोलताना आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले की ,सिद्धार्थ खरात टक्केवारी साठी आमदार झाला नाही. रस्ते , सभागृह आदी कामे करणे ते आपले कामच आहे ,पण समाजात आर्थिक प्रगती झाली पाहिजे, बेरोजगारी कमी झाली पाहिजे, सामाजिक न्याय देखील मिळाला पाहिजे यासाठी आपण काम करणार आहोत. राज्याचे वार्षिक दरडोई तीन लाख दहा हजार असून जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न केवळ ८० हजार आहे. त्यामुळे येथील लोकप्रतिनिधींनी केले काय, असा खणखणीत सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
यावेळी काँग्रेसचे पक्ष नेते अँड. अनंतराव वानखडे यांनीही. मार्गदर्शन केले. यावेळी पातूर तालुका भारतीय बौद्ध महासभेचे अ़ध्यक्ष राजेश सरकटे, वंचीत बहुजन आघाडीचे खामगाव तालुका सचिव बाळू मोरे, अँड . प्रितम वानखडे,गजानन राठोड, माजी सरपंच सखाराम आमले,अरूण वानखडे, उबाठा शाखाप्रमुख डिगांबर अल्हाट, पंडित देशमुख, दिलीप पायघन आदिंसह उपासक,उपासिका यांची भरगच्च उपस्थिती होती. अभय संगीत कला मंच अकोला च्या अंध कलाकारांनी यावेळी तथागत गौतम बुद्ध व बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर सुरेल गीते सादर केली. प्रास्ताविक जेष्ठ पत्रकार बाळू वानखडे यांनी केले. संचालन व आभारप्रदर्शन रुपेश वानखेडे यांनी केले. यशस्वीतेसाठी भिमशक्ती क्रिडा मंडळ, सह उपासक,उपासिका यांनी परिश्रम घेतले.



