बातमी

परिवर्तनाची चळवळ युवकांनी खांद्यावर घ्यावी – संदीप शेळके

परिवर्तनाची चळवळ युवकांनी खांद्यावर घ्यावी – संदीप शेळके
मौंढाळा येथील वन बुलढाणा मिशनच्या संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
बुलढाणा : जिल्ह्यात सिंचन, रोजगार, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण यासह इतर क्षेत्रात अजून बरेच काम करण्याची आवश्यकता आहे. राजकीय इच्छाशक्ती असल्याशिवाय ही गोष्ट शक्य नाही. याकरिता युवकांनी पुढाकार घेऊन परिवर्तनाची चळवळ खांद्यावर घ्यावी, असे आवाहन राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष तथा वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी केले.
तालुक्यातील मौंढाळा येथे ९ डिसेंबर रोजी सायंकाळी वन बुलढाणा मिशनचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. मंचावर विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना संदीप शेळके म्हणाले, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे शेकडो कोटींचे नुकसान केले. शासनाकडून अजून पंचनामे पूर्ण झाले नाही. तर मदत कधी मिळेल. लाखोंचे शेडनेट उध्वस्त झाले. सरकारने तुटपुंजी मदत देऊन फायदा नाही. भरघोस मदत देत शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे. सोयाबीन, कापूस उत्पादनात घट, यलो मोझाक, पीक विमा, अवकाळी पाऊस, नैसर्गिक आपत्ती अशी एकामागून एक संकटांची मालिका शेतकऱ्यांसमोर आहे. मात्र याकडे लक्ष देण्याऐवजी शासन सत्तेत मश्गूल असल्याची टीका संदीप शेळके यांनी केली. संवाद मेळाव्यात अनिल जाधव, विठठल मोरे यांनीही मार्गदर्शन केले.
सुरुवातीला गावातून निघालेल्या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. महामानवांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. जागोजागी माता- भगिनींनी संदीप शेळके यांचे औक्षण केले. सभेला धाड, बोरखेड परिसरातील नागरिक उपस्थित होते. संचलन आणि आभार नितीन उबाळे यांनी मानले.
…बॉक्स.…
राजकीय उदासीनतेमुळे विकासाचा अभाव
जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी अनेक सत्तापदे भूषवली. मात्र स्मरणात राहील असा मोठा प्रकल्प जिल्ह्यात आणता आला नाही. एखादा आणला तर तो टिकवता आला नाही. जिल्ह्यात एकही सूतगिरणी, साखर कारखाना सुरु नाही. खासगी तत्वावरील दूध संघ सुद्धा यांना उभारता आला नाही. अमूल, अमर, विकास हे बाहेरील दूध संघ जिल्ह्यातील दूध संकलित करतात.  राजकीय उदासीनतेमुळे जिल्हा विकासात मागे असल्याचा घणाघात संदीप शेळके यांनी केला.
..…बॉक्स…
जिल्ह्यात पर्यटनाच्या अनेक संधी
पर्यटनाच्यादृष्टीने आपला जिल्हा समृध्द करता येऊ शकतो. एवढेच काय तर जिल्ह्याला पर्यटन हब म्हणून ओळख मिळवून देता येऊ शकते. जिल्ह्यातील शेगाव, नांदुरा, बुलढाणा, देऊळगाव राजा, मेहुणा राजा, गारडगाव, सैलानी या अध्यात्मिक ठिकाणाना एकमेकांशी जोडल्यास अध्यात्मिक पर्यटन होऊ शकते. लोणार, सिंदखेड राजा, अंबाबरवा, ज्ञानगंगा अभयारण्य, पलढग, वान प्रकल्प असा पर्यटन कॉरिडॉर तयार करता येऊ शकतो. करण्यासारख्या अनेक बाबी आहेत. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी. जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेऊन वन बुलढाणा मिशन ही लोकचळवळ कार्यरत असून नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संदीप शेळके यांनी केले.
Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button